पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये पावणे तीन लाख हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी केली जाणार असून सध्या कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या गावातच खते व बि-बियाणे उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
काही दिवसापूर्वीच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतलेल्या व्हिसी बेठकीमध्ये देखील परिचारक यांनी हा मुद्दा लावून धरला होता. याला भरणे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. सध्या संपुर्ण देशात संचारबंदी असल्याने महाराष्ट्रामध्ये दळणवळणाची साधने बंद झालेली आहेत. याचा फटका
शेतकऱ्यांना बसत आहे. सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगाम सन २०२० मध्ये जबळ जवळ २ लाख ७३ हजार ९१२ हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी केली जाते. यामध्ये बाजरी, मका, उडीद, मुग, सूर्यफुल, सोयाबीन या पिकांची पेरणी केली जाते. यासाठी अंदाजे ३१ हजार ९७३ क्विंटल बियाणे लागतात. तसेच सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना या पिकांसाठी रासायनिक खते अंदाजे १ लाख ५८ हजार ४३२ मे.टन इतके लागते. याच्या खरेदीसाठी ते शहरा गर्दी करू शकतात. याचा विचार करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना येणाऱ्या खरीप हंगामामध्ये लागणारे रासायनिक खते व बि-बियाणे शेतकऱ्यांना त्यांच्या गावामध्ये उपलब्ध व्हावेत अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी राज्याचे मुख्यमंत्री ब उपमुख्यमंत्री यांचेकडे
लेखीपत्रद्वारे केली. यामुळे शेतकऱ्यांची मोठी सोय होणार असून कोरोनामुळे गर्दी टाळली जावून आजार रोखला जाईल असा दुहेरी फायदा होणार आहे.
ग्रामीण भागापेक्षा कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव शहरामध्ये खुप मोठ्या प्रमाणात आहे. आपण जर शेतकऱ्यांना प्रत्येक गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमार्फत, सहकारी साखर कारखाने यांचेमार्फत व कृषी विभाग यांनी स्थापन केलेल्या आत्मा शेतकरी गट यांच्यामार्फत प्रत्येक गावातील शेतकऱ्यांच्या गावात खते उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना शहरात जावे लागणार नाही व सुरक्षित अंतराचे पालन होण्यास मदत होईल, त्यामुळे कोरोना विषाणु ग्रामीण भागात पसरणार नाही. तसेच शेतकऱ्यांना रासायनिक खते व बि-बियाणे त्यांच्या गावामध्ये उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. अशी भूमिका आमदार प्रशांत परिचारक यांनी पत्राव्दारे मांडली आहे.
Post a Comment